Support JaalglyaBharat.
नवी मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे व उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी संदेश रवींद्र डोंगरे यांच्या गळ्यात विद्यार्थी सेनेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदाची माळ टाकली.
गेल्या ८
वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत विद्यार्थी संघटनेत काम करत असताना संदेश डोंगरे यांनी
विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्क वाढीचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यांचा
प्रश्न, गणेशोत्सव काळातील विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या पोषक
आहाराचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या डोनेशनचा प्रश्न
आदी प्रश्नांवर प्रशासनाच्या विरोधात आक्रमक आंदोलने करून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी
लावले. संदेश डोंगरे यांच्या या कार्याची दखल घेत अमित ठाकरे व आदित्य शिरोडकर यांनी
त्यांना विद्यार्थी सेनेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली.
त्याचप्रमाणे नवी मुंबईची शहर कार्यकारिणी देखील यावेळी
जाहिर करण्यात आली. उपशहर अध्यक्ष पदी निखिल गावडे, प्रशांत पाटेकर, श्रेयस शिंदे,
दशरथ सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सचिव पदी समृद्ध भोपी, सुमित जाधव, शुभम
इंगोले, प्रेम दुबे यांना जबाबदारी देण्यात आली. तसेच शहर सहसचिव पदी निखिल थोरात,
ओमकार गंधे, प्रमोद डेरे, सुरज निकम, विवेक शिंगोटे, सतीश पडघन, धिरज शिंदे यांची नियुक्ती
करण्यात आली.
यापुढील काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या
अनेक प्रश्नांसाठी विविध आंदोलन करून त्यांना वाचा फोडणार असल्याचे संदेश डोंगरे यांनी
सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याचे संदेश डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थी संघटना म्हणजे अॅडमिशन काळात पैसे उकळण्याचे अधिकृत परमिट असे नवी मुंबईत उपहासाने बोलले जात असल्यामुळे संदेश डोंगरे यांना आता त्यांच्या कार्यातून विद्यार्थी संघटनेबाबत निर्माण झालेला समज पुसुन टाकण्याचे आवाहन आहे. विनम्र स्वभावाचे, नेतृत्वाने सांगेल ती जबाबदारी पार पाडायची, स्वच्छ प्रतिमा, वादापासून चार हात लांब, संभाषणातील गोडवा अशी प्रतिमा असणाऱ्या संदेश डोंगरेंना उशिरा का होईना, न्याय मिळाल्याने विद्यार्थी चळवळीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.