Support JaalglyaBharat.
मुंबई : आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रकरणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना लेखी निर्देश देवून ‘अ’ प्रमाणे अहवाल मागविला आहे.पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, कळंबोली शहर अध्यक्ष संतोष कुमार शुक्ला, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, तळोजे विभागीय अध्यक्ष सुनील भोईर आदींनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेवून सविस्तर चर्चा केली.
त्यावेळी पनवेल संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनावर त्यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना आदेश काढले.ना. पाटील पुढे म्हणाले की, ठेवीदारांचे पैसे परत मिळाले पाहिजे. रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध. लादले आहेत, त्यामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. मात्र, ठेवीदारांसाठी उचित निर्णय घेण्याकरिता राज्य शासन निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी कडू यांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी ना. मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.सहकार आयुक्त कवडे यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच मंत्रालयात पुन्हा बैठक बोलावून कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे, ठेवी परत मिळवून देण्यासाठी धोरण ठरविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
संचालक, ट्रस्टची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत!.
बँक अध्यक्ष, जबाबदार संचालक आणि कर्नाळा ट्रस्टच्या मालकीची मालमत्ता त्वरित विक्रीस काढावी किंवा बँकेत ज्या 500 कोटीच्या ठेवी आहेत, त्यावर सहकार तज्ञांचा सल्ला घेवून त्यातून ठेवीदारांना पैसे परत केले पाहिजे.आर्थिक मंदी आणि बँक घोटाळामुळे ठेवीदारांना जगणे असहाय्य झाले आहे. त्यांच्या हक्काच्या ठेवी त्यांना परत मिळवून देण्यासाठी पनवेल संघर्ष समिती कार्यरत राहील.- कांतीलाल कडूअध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती